Sunday, November 13, 2016

पाल्यांचे करिअर,स्वप्न की स्वप्नांचे ओझे

    *पाल्याचे करियर , स्वप्न की स्वप्नांचे ओझे*
  

       आजचे पालकत्व ही अतिशय नाजुक आणि संवेदनशील बाब आहे.मुलांचे संगोपन आणि शिक्षण हा सर्व पालकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.'स्वप्न'म्हणजे सुचक गोष्टींचा गुंतावळा आहे.प्रत्येक व्यक्तीनुसार सुचक गोष्टींचा अर्थ वेगळा असतो.हाच गुंतावळा ,अपेक्षा चे ओझे मग पाल्यावर लादले जाते.पालकांना अपेक्षा असते आपल्या मुलांनी खुप मोठे व्हावं.नांव कमवावं.सध्या प्रत्येक घरात दोनच मुले आहेत.शिक्षणाचा वाढता खर्चही पालक करु शकतात.अगदी कितीही भरमसाठ फीस असली तरीही.आपले स्वप्न पुर्ण करण्याच्या नादात नकळतपणे स्वप्नांचे ओझे पाल्यावर लादले जाते.काही मुले हा पालकांच्या स्वप्नांचा भवसागर पार करतातही पण काहींच्या पदरी मात्र निराशा येते आणि यातुन अनेक प्रसंगांना ,समस्यांना या पालकांना सामोरे जावे लागते.जिकडे पहावं ति्कडे  स्पर्धा सुरु आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे .अगदी याची सुरुवात बालवयापासुनच म्हणजे तीन वर्षापासुन मुलांना जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागतेय हे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे.अगदी ग्रामीण भागात ही ३ वर्षापासुनची मुले या प्रवाहात आहेत.त्यांच्या बालपणावर हा अन्यायच आहे. तिथुनच पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर देऊन पालक त्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात होते.खाजगी क्लास,विविध शिबिरे  दिवसभर ही मुले बाहेरच असतात.त्यांच्या वेळापत्रकात ना खेळाला जागाe,ना कुणाशी संवादास जागा.जेवढा रिकामा वेळ मिळतो तो टि व्ही,संगणक,मोबाईललाच मिळतो.
     आईवडिलांना मुलांच्या शिक्षणावरुन खुप ताण येतो.ह्याचे कारण म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था.दुर्दैवाने शिक्षणापेक्षा सध्या स्टेस्ट्सलाच महत्व दिले जात असल्यामुळेच.व .पु .च्या भाषेत सांगायचे म्हणले तर "लोक काय म्हणतील" यालाच बरेचजण घाबरतात.वास्तविक ९०च्या दशकातील सुरुवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर  पोटापाण्याचे काय होणार.पण आता तसे खरेच आहे का???मुलांना नक्की काय आवडते.त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे याचा सर्वच पालकांनी विचार करायला हवा.पाल्यांना स्वत:चे विचार स्वतंत्र चांगले करु शकतील एवढे संस्कार द्या.कुठल्यातरी पुढा-याच्या बोडक्यावर डोनेशन फीस घालुन वरुन अजुन काही लाख रु.केवळ डिग्रीसाठी घालवण्याची गरज नाही.जर सुदैवाने एवढं सारं करण्याची आर्थिक परिस्थिति असली तर त्या परिस्थिती चा चांगला फायदा घेवुन मुलांना जे आवडते ते शिकु द्या.वेळ प्रसंगी रिस्क घेण्यास शिकवावे.त्यातुनच तो जीवनात यशस्वी व तरबेज होईल.शैक्षणिक यश हे आयुष्यातील यशास फक्त १०%कारणीभुत ठरते.समाजात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयाच झाले अन् व्यवसाय दुस-याच विभागात करतात. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रातही दिसतील. उदा.डॉ.निलेश साबळे.डॉ.अमोल कोल्हे.
          परंतु काही वेळा पालकांनी जरी पाल्यास समजुन घेतले.अपयशानंतर खचुन न जाता धिर दिला तरी आपल्या आजुबाजुचा समाज त्यास स्वस्थ बसु देत नाही.उदा.शिक्षक किंवा डॉक्टर दांम्पत्य असेल तर.....
*  तुम्ही दोघे नोकरदार ,किंवा शिक्षक असुन मुलाला ऐवढे कमी मार्कस् कसे आले??
*  आता तुमच्या मुलाचे कसे होणार??
*  त्याला आता ही साइड झेपेना,तुम्ही उगीच त्याला तिकडे टाकले,या...साइडला टाकले असते तर बरे झाले असते??
*  तुंम्हाला काय पैशाचा प्रॉब्लेम नाही म्हणा,अमुक अमुक ठिकाणी डोनेशन भरुन अॅडमिशन घ्या!!
*  तुम्ही त्याला रिपीट करु द्या ऐवढे वर्ष!
         असे आणि याहुनही भयानक फुकटचे सल्ले आजुबाजुची ही मंडळी देत असतात.पण अशा सल्ल्यामुळे तो विद्यार्थी किंवा त्याच्या पालकावर काय ताण येईल ?ही मंडळी जरासुद्धा विचार करत नाहीत आणि अशातच ही पालकमंडळी आपल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादत असतात.पालकांना हवे असलेल्याच शिक्षणास पाल्यांना प्रवेश देतात .काहीजण तर चक्क म्हणतात मला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे होते,त्यावेळची आमची घरची परिस्थिती किंवा तत्सम कारण सांगतात व ते स्वप्न आम्ही तुझ्यात पाहतोय म्हणुन तु हेच हो... असं म्हणतात.त्या मुलाचा कल,आवड पाहिली जात नाही.तो अभ्यासक्रम मग त्यास पेलवत नाही ,ताण येतो आणि त्यातुनच नैराश्य येवुन अनेक दुर्दैवी घटना घडतात.त्या आत्महत्या असो की व्यसन!त्यास पालकांच्या अपेक्षेचे ओझेच जबाबदार आसते.
      आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हे सध्या पालकाच्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहे.काही ठिकाणी मुलांना परिक्षेत कमी गुण आले तर घरात अगदी सुतकी वातावरण दिसते किंवा त्या मुलाने काही एखादा गंभीर गुन्हा केल्यासारखे त्याला स्वत:च्याच घरात वागणुक मिळते.हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे? पालकांनी मुलांबरोबर मित्रत्वाचे नाते ठेवावे.वेळोवेळी मार्गदर्शक बनावे.हीच एक माफक अपेक्षा.

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment