Saturday, September 24, 2016

शहीद अमर जवान-तुझे सलाम

अश्रुंचाही पुर आला
बघुन शहीद जवानांची शवपेटी
देशाचे रक्षण करता आले वीरमरण
धन्य ती माय!असा पुत्र जन्मला पोटी!
****************************
शहीद वीर जवान
सलाम तुमच्या कार्याला
देश रक्षणार्थ
पंचप्रण तुम्ही अर्पिला !
*************************
संगीता भांडवले(मु अ)
जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी
जि.उस्मानाबाद

Sunday, September 4, 2016

गणेशोत्सव काल आणि आज

   ⚜ *गणेशोत्सव काल आणि आज*⚜
-----------------------------------------------------
         *वक्रतुंड महाकाय,सुर्यकोटी समप्रभ*
          *निर्विघ्नं कुरुमेंदवो, सर्व कार्येषु सर्वदा*।
     गण म्हणजे लोक,अशा गणांचा जो नायक तो गणनायक,अर्थातच गणपती.जनसामान्यांचा गणपतीबाप्पा.गणपती युद्धात सेनापती तर नृत्यकलेतही निपुण त्याचबरोबर विद्येचा दाताही आहे असे म्हणतात.अ,उ,म यांच्या अर्धमात्रेतुन ॐची निर्मिती झाली.ॐकारापासुनच विश्वाची निर्मिती झाली असे मानतात.म्हणजेच गणपती ही विश्वरुप देवता आहे.संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी
*ॐ नमोजी आद्या।वेदप्रतीपाद्या।*
*जय जय स्वयंवेद्या।आत्मरुपा।*
असं गणेशस्तवन केलेले आहे.गणपतीची मुर्ती मोठी व पोट मोठे व डोळे लहान अशी असते.भक्तांचे अपराध पोटात घालुन तो लंबोदर झाला तर वक्राचे म्हणजे दुष्टांचे तुंडन करणारा म्हणुन तो वक्रतुंड झाला.असुराशी लढताना डावा सुळा मोडला म्हणुन तो एकदंत तर भालप्रदेशावर चंद्राची कोर म्हणुन तो भालचंद्र अशी कितीतरी नांवे गणेशाला आहेत.सर्व पुजेत पहिला मान गणेशाचा.फार पुर्वीपासुन या देवतेचे पुजन लोक अगदी श्रध्देने करतात.छत्रपती शिवरायांच्या काळात देखील गणेशाची पुजा केल्याचे पुरावे आढळतात.गणेशाची आराधना करणे म्हणजे उत्सव.भाद्रपद चतुर्थीला सर्व घराघरात गणेशाची स्थापना करण्यात येते.त्याचेच औचित्य साधुन लोकमान्य टिळकांनी सन १८९६ साली या घरोघरी बसणा-या गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले.टिळकांचा हा उत्सव सुरु करण्यामागे एकच हेतु होता तो म्हणजे लोकांना एकत्रित कऱणे,त्यांच्याशी संवाद साधणे.कारण १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीला,अमानुष छळाला सर्व भारतीय कंटाळले होते.इंग्रज सरकार भारतीय लोकांना एकत्रित येऊ देत नसत यावर उपाय म्हणुन टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव सुरु केले.त्याला आज १२०वर्षे पुर्ण होतायेत.अशे उत्सव सुरु करणे ही त्यावेळी काळाची गरज होती.
       पुर्वी गणेशोत्सव खुप कमी खर्चात साजरे व्हायचे,म्हणजे माझ्या बालपणी तर आम्ही सर्व बच्चेकंपणीच  गणेशमुर्ती आणण्यासाठी कुंभारवाड्यात जायचो.कुंभाराचे भिमाकाका(आजही ते आहेत)मातीपासुन,शाडुपासुन  बनविलेली रंगविरहीत मुर्ती द्यायचे.गणपतीबाप्पा मोरया म्हणतच आम्ही सर्वजण रस्त्याने गलका करत यायचो.आयाबाया खुप कुतुहलाने पहायच्या.नाहीतर आज.....गणेशाच्या मुर्तीच्या निवडीपासुन  मंडळापर्यंत आणुन स्थापना करणे पर्यंत कर्णकर्कश आवाजानेच सारा परिसर दुमदुमुन गेलेला असतो.आयाबाया कुतुहलाऐवजी, चिडुनच कानावर हात ठेवुन निमुटपणे हे सारे सहन करत असतात.पुर्वीच्या गणेशमुर्ती शाडुच्या असल्यामुळे  पाणी प्रदुषणाची चिंता नव्हती.आज प्लँस्टर ऑफ पँरिसच्या ,कञिम रंगीत मुर्तीमुळे पाणी प्रदुषणाची चिंता भेडसावत आहे.यात बदल होणे गरजेचे आहे.इकोफ्रेंडली मुर्तींची स्थापना करणे काळाची गरज आहे.पुर्वी च्या उत्सवात विद्युत रोषणाईचा वापर खुप कमी असायचा.आज अगदी लख्ख प्रकाशात,दिव्यांच्या झगमगाटात अनेक मंडळाने आकर्षक देखाव्यांच्या नांवाखाली विजेचा अमर्याद वापर करताना दिसत आहेत.पुर्वी मोठी मंडळे असतील तर त्याठिकाणी देखावा असायचा,छोट्या मंडळापुढे गाणी,नाटक,नकला किंवा व्ही.सी.आर वर एखादा सिनेमा,नाटक दाखवलं जायचं.गणपतीपुढे गाणी वाजायची,पण ती कर्णमधुर,भजने,मराठी हिंदी सिनेमातील गाणी,गवळणी इ.प्रकारची असायची.या उत्सवात श्रद्धेबरोबरच विचारांची देवाणघेवाण व्हायची.लोक एकत्र यायचे.
       परंतु आता तर याउलट परिस्थिती पहावयास मिळतेय.दिवसेंदिवस या उत्सवाचे स्वरुप बदलु लागलेय.अगदी उंचचउंच म्हणजे पाच-सहा फुटी  प्लँस्टर ऑफ पँरिसच्या मुर्ती, आणि त्या विसर्जन करण्यासाठी आहे तेवढा पाणी साठाही दुषित होऊ लागलाय.गेली तीन चार वर्षे दुष्काळी परिस्थिती पहावयास मिळतेय, त्यात मुर्ती विसर्जनातुन होणा-या प्रदुषणाची चिंता व विसर्जन करताना घडणा-या अनेक दुर्दैवी घटना याचे चिंतन करण्याची गरज आहे.विद्युत रोषणाईचा तर कहरच म्हणायचा ना!या दहा दिवसात कितीतरी मेगावँट विजेचा अपव्यय होतो.ग्रामीण भागात सध्या बारा-बारा तास विजेचे भारनियमन  आहे.यामुळे शालेय विद्यार्थी व शेतक-यांचे खुप नुकसान होतेय.यासाठी प्रत्येक मंडळाने विजेचा मर्यादीत वापर केला, वीज बचत केली तर या विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल,शेतीला पाणीपुरवठा झाला तर पिके चांगली येतील,शेतकरी सुखावेल.पण नाही!!!!असे होणार नाही, असं कुणी करणार नाही कारण,गणपती उत्सवाची वर्गणीच एवढी जमा होतेय की!!वर्गणी कसली...खंडणीवजा वर्गणीच म्हणायची.ती एवढी जमा होतेय की ही मंडळे आपली सद्सद् विवेकबुद्धीच हरपुम बसलेत.आपण उत्सवात गाणी कोणती ऐकवावीत  याचेदेखील भान त्यांना नसते.तरुणाई तर त्यांच्या तालावर अगदी मद्यधुंद अवस्थेत  थिरकत असते.काही मंडळांमध्ये तर रात्ररात्र पत्यांचे डाव खेळत असतात.वर्गणी मागण्याचे तर विविध हातखंडे ही मंडळी वापरतात.लाखोंवर वर्गणी जमा करतात.काही स्वखुशीने तर काही नाईलाजानेच वर्गणी देत असतात.याचा चुराडा या उत्सवकाळात कसा करायचा हे नियोजनबद्ध ठरलेले असते.पण काही मंडळे याला अपवाद असतात.विविध सामाजिक विषयावर प्रबोधन केले जाते.विविध उपक्रम राबविले जातात.समाज प्रबोधनपर देखावे सादर केले जातात.अशा मंडळांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असते.ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला त्याच मार्गावर आपण आहोत का?याचे चिंतन करण्याची गरज आहे. नुकतेच माझ्या वाचनात आले की ,या दहा दिवसात १२००कोटी रुपये खर्च होतात.किती अपव्यय होतो पैशांचा!हिच रक्कम जर आपण सत्कार्यासाठी वापरली तर!म्हणजे-----
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शिक्षण,मुलींचे लग्न,कुपोषित बालकांना सकस आहार.विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत,काहींची शैक्षणिक फीस,गरीब व होतकरु मुलांना दक्तक घेणे,गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे,विधवा व परित्यक्ता महिलांना मदत,अनाथाश्रम,वृध्दाश्रम,कुष्ठसेवाधाम इत्यादींना मदत केली तर नक्कीच ख-या अर्थाने आपण श्रद्धापुर्वक गणेशउत्सव साजरा केल्याचा जो आनंद मिळणार आहे तो दहा दिवस नाचुन धांगडधिंगाणा घालुन मिळणार नाही.याचे भान सर्वच मंडळाने ठेवावे.
      यावर्षीच्या  मंडळांनी तरी बदल करणे गरजेचे आहे.माझ्या मते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे,महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन त्यांच्या विविध स्पर्धा--रांगोळी,मेहंदी,विणकाम,भरतकाम,संगीतखुर्ची,पाककला इ.स्पर्धा घेवुन त्यांचा गुणगौरव करावा. स्त्रीभ्रुणहत्या,वृक्षारोपण,अवयवदान,इ.विषयाचे प्रबोधन मंडळाकडुन व्हावे.मिरवणुक साध्या पद्धतीन व शिस्तबद्ध काढावी.एक गांव एक गणपती ही संकल्पनाराबवावी.छोट्या मुर्ती चे विसर्जन करावे,दोन तीन वर्षे एकच मुर्ती वापरावी.यानंतरही वर्गणी शिल्लक राहीली तर पुढील वर्षी त्याचा वापर करावा किंवा वर्षभरात एखादी दुर्दैवी घटना दुर्दैवाने घडली तर मदत करावी.दिर्घ आजारी व्यक्तींच्या औषधोपचारासाठी त्या कुटुंबास हातभार लावावा व येणा-या नवीन पिढीसमोर एक आदर्श घालुन द्यावा.जशी आपण गणेशाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत तशीच  गणेशोत्सवाची वाट येणा-या पिढीने पहावी.सर्वांनी तोंडभरुन कौतिक करावे असे कार्य करुन  आपण आदर्श घालुन द्यावा एवढीच माफक अपेक्षा!
**************************************************
     ✍🏻 *संगीता भांडवले*✍🏻
              मुख्याध्यापिका
            जि प प्रा शाळा शेंडी
           *ता .वाशी जि. उस्मानाबाद*
               मोबा.नं.९९२३४४५३०६
               

दैनिक दिव्यमराठी वर्तमानपत्रात प्रकाशित माझा लेख '*शालेय जीवनातील खेळाचे महत्व*'

Wednesday, August 31, 2016

शालेय जिवनात खेळाचे महत्व

  ⚽ *शालेय जिवनात खेळाचे महत्व*⚽
      *****************************

आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.बदलत्या जिवनशैलीमुळे सर्वांचेच शारिरिक कष्ट कमी झाले आहे.सध्याचे युग हे माहीती व तंत्रज्ञानाचे युग आहे.या युगामध्ये शारिरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक तयार करणे आज आव्हान बनले आहे.तंत्रज्ञानाशिवाय तर पर्याय नाही.माणुस हा बुद्धीवान प्राणी.तो आपल्या बुद्धीच्या जोरावर आजुबाजुचे वातावरण बदलतो आहे.मात्र या सर्व बदललेल्या जिवनशैलीमुळे माणसाचे शारिरिक कष्ट व शुद्ध मोकळी हवा यापासुन कोसो दुर गेला आहे.आज सर्वच वयोगटातील व्यक्तीवर निरनिराळे ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहेत.परिणामी मानसिक,शारिरिक, भावनिक असंतुलन वाढत आहे.त्यामुळे समाजामध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
        " *आरोग्यम् धनसंपदा*"
वास्तविक पाहता आपले शरीर ही आपली मौलिक संपत्ती आहे.म्हणुन तिची ओळख करुन घेणे ,नियमित व्यायाम करुन घेणे ,त्याची सवय अंगी बाणने हे आपले कर्तव्य आहे.म्हणुनच शालेय जिवनापासुनच या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले नसेल तर त्याची वाढ व विकास  चांगला होत नाही.विद्यार्थ्याच्या अंगी असणा-या प्रचंड ऊर्जेला विविध खेळातुन जो वाव व दिशा मिळते याचा सध्या अभाव दिसतो आहे.
       विविध शारिरिक हालचालींमुळे,खेळांमुळे मुलांवरील ताणतणाव कमी होतो.खेळ ही मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि आनंदी व तणावरहित मुले जास्त कार्यक्षम असतात.म्हणुनच शालेय जिवनात खेळाचे महत्व अनन्यसधारण आहे.
   लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते.म्हणुनच खेळाची आवड ही बालवयापासुनच लावली पाहिजे.प्राथमिक स्तरापासुन विविध खेळात तो समरस झाला पाहिजे.खेळामुळे शिस्त,जिद्द हे गुण वाढीस लागतात.परंतु आज विद्यार्थ्यांच्या वास्तविक गरजा व त्यांची आवड याकडे दुर्लक्ष होत आहे.
      विद्यार्थ्यांची एकमेव योग्यता पारखण्याचे मापदंड म्हणजे परिक्षेत मिळणारे गुण अशी परिस्थिती आज बहुतेक घरात असल्यामुळे मुलांना शाळा व क्लास,व्हिडीओगेम,बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर ,यात संगणक,मोबाइल.या सर्वांमध्ये तो मैदानी खेळ खेळणे पार विसरुनच गेला आहे.मैदानी खेळसुद्धा मोबाइल, संगणकावरच ही मुले खेळत आहेत.त्यामुळे शुद्ध हवा घेणे तर दुरच!या सर्वांतुन विद्यार्थ्यांची नैसर्गिक वाढ ,विकास,अंगभुत क्षमता त्यांच्या मानसिक,भावनिक व सामाजिक गरजा लक्षात येत नाहीत.परिक्षेतील गुण म्हणजे पुढील आयुष्यात यश आणि समाधान मिळविण्याचा एकमेव मार्ग मुळीच नाही.जिवनात यश प्राप्त करायचे असेल तर वेळेचे नियोजन,समुहात काम करण्याची क्षमता,स्वत:च्या व इतरांच्या भावना समजणे,इतरांशी संवाद साधता येणे,नेतृत्वगुण असणे,ताणतणाव हाताळता येणे यासारखी अनेक जिवनकौशल्य अंगी असवी लागतात.ही सर्व कौशल्य मैदानावर ,समुहात खेळताना आपोआपच नकळत अंगी बाणली जातात.विकसित होतात.तसेच जिद्द,चिकाटी,मैत्री, विश्वबंधुत्वाची भावना ,खिलाडुवृत्ती यासारखे गुण मैदानावर खेळ खेळताना विकसित होत असतात.याबरोबरच व्यक्तीमत्व विकसित करणारे अनेक इतर सामाजिक गुण देखील विद्यार्थी नकळत आत्मसात करतात.म्हणुन शालेय जिवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
        बालवयापसुनच नियमितपणे खेळ खेळण्याची गोडी लावल्यास त्यातुनच उत्कृष्ट क्रिडापटु तयार होतील.म्हणुन शालेय वेळापत्रकातील खेळाच्या तासिका खेळ घेऊन आपण उत्कृष्ट क्रिडापटु घडवुयात!नियमितपणे खेळ घेऊयात!नियमितपणे दिर्घकाळ येणारी मानसिक व शारिरिक कणखरता ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीची हक्काची संपत्ती असते.यावरुन शालेय जिवनात प्राथमिक टप्प्यावरच शारीरिक शिक्षण दररोज असणे ही विद्यमान व भविष्यकाळाची गरज आहे.आपण " *किती जगतो यापेक्षा कसे जगतो* "याला महत्व आहे.
       शालेय जिवनातच विद्यार्थ्याची शारिरिक सदृढता व मानसिक आरोग्य विकसित झाले पाहिजे.आरोग्यविषयक सवयीची जाण असली पाहिजे.समाजात मिळुनमिसळुन राहणे व आनंदाने उत्साहाने आपली नित्य कामे करता येणे आणि नितीमुल्यांची जोपासना करुन जिवनभर खिलाडुवृत्तीने राहणे यासारख्या बाबींदेखील साध्य करायच्या आहेत.
        विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी व शाळेत टिकवुन ठेवण्याची क्षमता खेळामध्ये आहे. म्हणुन शालेय जिवनातच खेळाची सवय अंगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी भोवतालच्या  परिसरात खेळल्या जाणा-या खेळांचा समावेश शाळेमधेही करण्यात यावा.शाळाभरण्यापुर्वी व नंतर मैदानावरील काही खेळ घ्यावेत.यासाठी  विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी उन्हाळी,दिवाळी सुट्ट्यांमध्ये खेळशिबिरे घ्यावीत.मुलांचा जास्तीत जास्त रिकामा वेळ खेळातच घालवावा.कारण आज बहुतांशी घरात मुले खेळायचे म्हंटलं तरी त्यांना पालक परवानगी देत नाहीत.मुलांवर अभ्यासाचा ताण असतो.पालकाचा धाक असतो.म्हणुन शाळेनेच विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त खेळाच्या तासिकेत  विविध खेळाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना तणावमुक्त करुन त्यांच्या अंगी असणा-या सुप्त क्षमतांचा विकास होईल व शाळेकडुन विद्यार्थ्यांना उत्तम खेळाडु बनन्याची संधी मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
****************************************************🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀
           ✍🏻संगीता भांडवले✍🏻
                 मुख्याध्यापिका
               जि प प्रा शा शेंडी
                ता वाशी जि उस्मानाबाद

Monday, August 15, 2016

माझी शाळा-माझा उपक्रम

🔵 *माझी शाळा माझे उपक्रम* 🔵

🇮🇳  *स्वातंत्र दिन उत्साहात साजरा*🇮🇳

🇮🇳 *जि.प.प्रा.शा.शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*🇮🇳

🇮🇳 *आज जि.प .प्रा.शा.शेंडी येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.*

🇮🇳 *सकाळी प्रभात फेरीने सुरवात झाली.*

👬  *गावातील परीसर विद्यार्थी घोषणांनी  दुमदुमला.*

🇮🇳  *सर्व विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीते सादर केली.*

🇮🇳 *शाळेतील ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायतच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.*

🇮🇳  *या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्द्ल *मराठी,हिंदी,इंग्रजी*  *भाषेत आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित पालक व गावकरी यांची मन जिंकुन घेतली.यात ११ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतुन  अस्खलित भाषणे केली.*

🇮🇮🇳 *मुख्याध्यापिका संगीता भांडवले यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची व शासकिय योजनांची माहीती दिली.*

🇮🇳 *ई-लर्निंगसाठी निधी संकलीत करुन लवकरच हे युनिट आपण शाळेत कार्यान्वित  करणार आहोत यासाठी निधी सढळ हाताने देण्यासाठी आवाहन करण्यात आले.*

🇮🇳 *शाळेतील चांगल्या बाबी ग्रामस्थांसमोर मांडत, शाळेला असणा-या उणिवांची व त्यावरील उपाययोजनांची  चर्चा करण्यात आली.*

🇮🇳 *प्रेरक सौ मनिषा मोरे यांनी आपले विचार व्यक्त करत शाळेचे बदललेले स्वरुप ग्रामस्थांसमोर मांडले, व संगीता भांडवले यांच्यावर तयार केलेले काव्य वाचन केले.*

💥 *देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या व भाषण करणा-या विद्यार्थ्यांना सरपंच  सौ. कबई वीर व उपसरपंच  सतीश मोरे यांनी रोख स्वरुपात बक्षिस दिले.*

🇮🇳 *कार्यक्रमाचे प्रास्ताविक चौधरी अनिल यांनी केले.*

🍫 *विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व उपस्थितांना चहापान करून कार्यक्रमाची सांगता झाली.*

🇮🇳 *याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,ग्रामस्थ व युवक  वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.*

🇮🇳 *ग्रामस्थांनी  केलेल्या कौतुकामुळे ऊर् भरुन आला व मिळालेल्या प्रेरणेतुन पुढील कार्यास ऊजा मिळाली.*

,🇮🇳 *आम्हाला नेहमीच साथ, पाठिंबा नि पाठबळ  देणा-या पालकांचे व सर्व आनंदी विद्यार्थ्यांचे तसेच  सहकार्य करणा-या सर्व हितचिंतकाचे मनस्वी आभार.*

🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
            
          ✍🏻संगीता भांडवले✍🏻
            मु अ जि प प्रा शा शेंडी
             ता वाशी जि उस्मानाबाद
             myshikshankatta.blogspot.com

जि प प्रा शा शेंडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व  शिक्षक यांची भाषणे झाली.,सौ.मनिषा  मोरे यांनी शिक्षकांबद्दलचा आदरभाव व्यक्त करत शाळेचे बदललेले स्वरुप ग्रामस्थांसमोर मांडले व माझ्यावर एक सुंदर कविता तयार करुन कविता वाचन केले.मी भारावुन गेले आणि गावक-यांकडुन मिळालेली माझ्या कामाची पावती समजुन मी ऋण व्यक्त करत मनातल्या मनात खुप मोठा पुरस्कार मिळाल्यागत आनंदी झाले.विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजीतुन भाषणे केली व  उपस्थितांनी असे आश्वासन दिले की,इथुन पुढे एकही मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही पाठवणार नाहीत.यावर्षी तीन मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील माझ्या शाळेत प्रवेशित झाली आहेत.लहान गावात हा खुप मोठा बदल पाहुन गांवकरी  नेहमी आमच्या हाकेला ओ!म्हणत मदत करण्यास तत्पर असतात.
  विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ,लेखन साहित्याचे वाटप व बक्षिसे देऊन अनेक दानशुर व्यक्तींनी सहभाग नोंदवला.त्यांचे शाळेच्या वतीने मनस्वी आभार.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
               संगीता भांडवले
             मु अ जि प प्रा शाळा शेंडी
             ता वाशी जि उस्मानाबाद
             myshikshankatta.blogspot.com

Sunday, August 14, 2016

महिलांचे स्वातंत्र्य अन् स्वातंत्र्याची ७०वर्षे

🔴   *महिलांचे स्वातंत्र्य* 🔴
अन्..............
       🔵 *स्वातंत्र्याची ७०वर्षे*🔵
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   संगीता भांडवले,वाशी जि उस्मानाबाद
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

      स्वातंत्र्य मिळुन६९ वर्षे झाली.तरी आजची स्त्री ही म्हणावी तेवढी स्वतंत्र आहे का? याचा शोध घेण्याची वेळ माझ्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रिला आली याची खंत वाटतेय.इंग्रजांच्या पारतंत्र्यातुन,गुलामगिरीतुन आपला देश स्वतंत्र झाला खरा पण आपल्याच घरात कोणत्याही निर्णयाचे स्वातंत्र्य नसलेल्या ,पुरुषांची गुलामगिरी सहन करणा-या आज कितीतरी स्त्रिया सापडतील.मग ख-या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का??
          आज मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक स्त्रिया या स्वत:च्या पायावर उभा असुन नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्या आहेत.कमावत्या आहेत पण त्यांना त्यांचाच पैसा मनासारखा खर्च करण्याचे स्वातंत्र्य नाही. घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांना विचारुनच पैसे खर्च करावे लागतात. मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?हा प्रश्न पडतो.घरात कुठलेही धार्मिक कार्य असो की अजुन काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तर स्त्रिला सामावुन घेतले जात नाही.तिची मते विचारात घेतली जात नाहीत.समाजात मानाचे स्थान येताच तिच्या हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले जाते.कित्येक ठिकाणी तर फक्त निवडणुकीत आरक्षित पद आहे म्हणुन स्त्रियांना निवडणुक लढवु दिली जाते.पण प्रत्यक्ष कारभार मात्र त्यांचे पतीच पाहतात.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        मुलांचे शिक्षण असो की लग्न,घर खरेदी असो की अजुन काही. जेंव्हाजेंव्हा कुटुंबातील काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा मात्र घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांचा निर्णय अंतीम समजला जातो.स्त्रिच्या निर्णयाला काहीच महत्व नसते.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        काही कुटुंबात मात्र या उलट परिस्थिती असते.स्त्रिचा आदर केला जातो.तिची ही मते विचारात घेतली जातात.प्रत्येक निर्णयात तिला सामावुन घेतले जाते. ती कुटुंबे  खरच आज प्रगत झालेली कुटुंबे आहेत असे म्हणले तर वावगे होणार नाही.
         परंतु एवढेच मर्यादीत स्वातंत्र्य स्त्रिला पुरेसे नाही.तिचे पंख छाटु नका.तिच्या आनंदाची चावी तुमच्या हाती ठेवु नका.तिला प्रत्येक निर्णय प्रक्रियेत पुरेसे स्वातंत्र्य द्या.बघा त्या कुटुंबाची कशी भरभराट झालेली दिसेल.....पण...पण एवढेच स्वातंत्र्य पुरेसे नाही अजुन बराच पल्ला गाठायचाय.दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे २०२०साली देश महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करायचेय.मग द्या ना स्त्रिला ही सन्मान,निर्णय प्रक्रियेत मान,मग आपला देश ख-या अर्थाने बनेल महान!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
             ✍🏻संगीता भांडवले✍🏻
                 वाशी जि उस्मानाबाद
                  myshikshankatta. blogspot.com